Friday 10 August 2012

गोष्ट जिद्दी ष्वांगच्या पराक्रमाची!

युआन ष्वांगबद्दल तुम्ही कधी ऐकलं आहे का? ष्वांग हा खूप हुशार बौद्ध धर्मगुरू होता. इ. स. 630 म्हणजे म्हणजे 1383 वर्षापूर्वी या जिद्दी धर्मगुरूनं भारताचा प्रवास करायचा ठरवला. त्या काळी आत्ताच्यासारखी काही प्रवासाची साधनं नव्हती. विमानाचा शोध ही तर खूपच अलीकडची गोष्ट आहे. त्यामुळे सारा प्रवास व्हायचा तो पायी किंवा घोडय़ावरून. शिवाय चीनमधून भारतात येण्यासाठीही सरळ असा रस्ता नव्हता. त्यासाठी अनेक डोंगरं, दऱ्या आणि वाळवंटांचा आडवातिडवा प्रवास करावा लागे. वाटेत लुटारूंच्या टोळ्या असत. त्या प्रवाशांना लुटून त्यांच्याकडील सगळ्या मौल्यवान वस्तू, पैसे हिसकावून घेत. कधी कधी प्रवाशांना ठारही मारत. नद्या ओलांडणं आणि बर्फातून प्रवास करणं हेही तेव्हा वाटतं तितकं सोपं नव्हतं.
 
अशा काळात ष्वांगनं भारतात येऊन इथल्या बौद्ध धर्मग्रंथांचा अभ्यास करायचा ठरवलं. ष्वांग निश्चयाचा पक्का होता. एकदा ठरवलं की, ती गोष्ट तो पूर्ण करत असे. मग वाटेत कितीही संकटं येवोत अगर काही होवो. ष्वांग काही डगमगणारा गडी नव्हता. त्याला भारतातील विद्वान पंडितांकडून बौद्ध धर्मशास्त्रांचा अभ्यास करायचा होता आणि ते धर्मग्रंथ चीनला घेऊन जायचे होते.
 त्या काळात भारतात बौद्ध धर्माचा खूप प्रभाव होता. आणि बौद्ध धर्माविषयीचं खूप साहित्यही भारतात होतं. ते पाहण्यासाठी आणि त्यांचा अभ्यास करण्यासाठी भारतात येणं गरजेचं होतं. पण त्या काळी चीनमध्ये देश सोडून जाण्याला परवानगी नव्हती. पण ष्वांग खूप लोकप्रिय आणि विद्वान धर्मगुरू होता. त्यामुळे त्याच्यावर प्रेम करणारे लोकही खूप होते. त्यांच्या मदतीनं ष्वांगनं भारतात येण्याची योजना आखली. पण हा सारा प्रवास त्यायला चोरीछुपे करावा लागणार होता. पकडलं गेलं तर शिक्षा होण्याचीही भीती होती. पण ष्वांगनं काहीही झालं तरी भारतात जायचंच, असा चंगच बांधला होता. मग त्यानं दोन वाटाडय़ांना सोबत घेऊन चीनमधून बाहेर पडण्याच्या प्रयत्न केला. चीनच्या सीमेपर्यंत आल्यावर ते ष्वांगचे दोन्ही वाटाडे गुप्तहेरांच्या ससेमि-याला घाबरले. त्यामुळे ष्वांगने त्यांना तिथेच सोडून एकटय़ानंच सीमा ओलांडायचं ठरवलं. पण तेही काही सोपं नव्हतं. सीमेवर काही मैलांच्या अंतरावर उंच मनो-यावर सशस्त्र पहारेकरी पहारा देत असत.
ष्वांग त्यांच्या तावडीतून सुटतो. पण त्याला भारताकडे जाणारा रस्ताही धड माहीत नसतो. पण म्हणतात ना तुमचा निश्चय पक्का असेल आणि त्यासाठी भरपूर मेहनत घ्यायची तुमची तयारी असेल तर तुम्हाला काहीही शक्य होतं. ष्वांग अगदी तसाच गडी होता. भारतात पोहचेपर्यंत त्याच्या मार्गात अनेक संकटं आली, अनेकदा त्याच्या जिवावर बेतलं, जो जिथे जिथे थांबला तेथील सरदार-राजांनी त्याला त्यांच्याकडेच राहण्याचा आग्रह केला. त्याबदल्यात भरपूर संपत्ती देण्याचं आमिष दाखवलं. पण ष्वांग कशालाही बधला नाही.
 अखेर ष्वांग काश्मीरमध्ये पोहोचतो. येथील निसर्गसौंदर्य पाहून तो खूप खुश होतो. त्या वेळच्या काश्मीरमधील लोकांविषयी त्यानं लिहून ठेवलं आहे की, ‘पुरुष कापडाची एक लांबलचक पट्टी कमरेभोवती गुंडाळून बगलेपर्यंत घेतात व उजवा खांदा उघडाच ठेवतात. स्त्रिया दोन्ही खांदे झाडून टाकणारा असा लांब पायघोळ झगा घालतात..’ काश्मीरमध्ये ष्वांग दोन वर्षे राहतो. मग जालंधर आणि कुलूची तीर्थयात्रा करतो. नंतर मथुरेला येतो. वाराणसी, कपिलवस्तू, बोधगया असा प्रवास करतो. त्या वेळी गयामधील नालंदा हे विद्यापीठ खूप प्रख्यात होतं. नालंदामध्ये ष्वांग अनेक बौद्ध धर्माच्या आणि हिंदू धर्माच्या ग्रंथांचा अभ्यास करतो.
 ष्वांग भारतात यायला निघतो तेव्हा ते अवघा 28 वर्षाचा तरुण असतो. सुमारे तेरा वर्षे भारतात विविध ठिकाणी प्रवास करून, अनेक ग्रंथांच्या प्रती नकलून तो स्वत:बरोबर घेतो. इ. स. 645 मध्ये ष्वांग चीनला परत जातो. चीनचा सम्राट त्याचं खूप भव्यदिव्य स्वागत करतो. ष्वांगनं भारतातून आपल्यासोबत 657 ग्रंथ आणलेले असतात. पुढच्या काळात त्यांचं चिनी भाषेत भाषांतर, संपादन आणि लेखन करण्यात तो आपलं आयुष्य घालवतो.
 ष्वांग हे एका जिद्दीचं नाव आहे. ष्वांगचं हे पुस्तक का वाचायचं? तर या त्याच्या पुस्तकातून ष्वांगची आपल्या कामावरची निष्ठा काय होती? त्यासाठी त्यानं किती आणि कसे कष्ट घेतले? कोणकोणत्या संकटांचा सामना केला? भारतात तेरा वर्षे राहून त्यानं कसा अभ्यास केला? आणि भारतातून सोबत नेलेल्या ग्रंथांचं चिनी भाषेत कसं भाषांतर केलं? हे सगळं जाणून घेता येतं. शिवाय ष्वांगनं आपल्या या चीन ते भारत आणि भारत ते चीन प्रवासाची हकिगत लिहून ठेवली आहे. त्यातून त्या वेळचा भारत कसा होता? इथे कोणकोणते राजे होते? ते चांगले होते की वाईट होते? त्या वेळचे लोक कसे होते? ते कसे राहत? अशा अनेक गोष्टी समजतात.
पुस्तक वाचून हजार वर्षापूर्वी आणि त्याही आधीचे लोक कसे होते हे समजावून घेता येतं. थोडक्यात ष्वांगच्या पुस्तकातून हजार वर्षापूर्वीचा भारतच समजून घेता येतो. म्हणून हे वाचायचं.
 
  • युआन ष्वांगची भारत यात्रा : बेलिंदर आणि हरिंदर धनोआ, मराठी अनुवाद निर्मला चंद्रकांत
  • नॅशनल बुक ट्रस्ट, विभागीय ऑफिस, प्रभादेवी, मुंबई
  • पाने : 62, किंमत : 11 रुपये

Monday 11 June 2012

शेपूट कापा, शेपूट कापा

इसापनीतितल्या गोष्टी जरा नव्या प्रकारे लिहिण्याचा प्रयत्न मी सध्या किलबिलमध्ये करतो आहे. त्यातील हे एक गोष्ट.
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
एकदा एका पारध्यानं जंगलात सापळा लावला. त्याला खरं तर हरीण पकडायचं होतं. बऱ्याच दिवसांपासून त्याला हरणाची शिकार करायची इच्छा होती, पण ते लेकाचं काही त्याच्या तावडीत सापडत नव्हतं. कसं सापडणार, शिकारी दिसला की, ते अशी काही धूम ठोके की, शिकारी त्याच्याकडे नुसता पाहतच राही. शेवटी बऱ्याच वेळा प्रयत्न करूनही यश येत नाही म्हटल्यावर शिका-यानं त्याला पकडण्यासाठी सापळा लावला आणि तो घरी गेला. दुपारी छानपैकी जेवण करू, थोडीशी झोप काढू, तोवर सापळ्यात अलगद आपली शिकार आलेली असेल असा शिका-याचा विचार होता.
 
पण इकडे जंगलात झालं उलटंच. शिका-यानं लावलेल्या सापळ्यात हरणाऐवजी एक कोल्हा अडकला. शिकारी घरी होता म्हणून ठीक होतं, नाहीतरी त्याची काही खैर नव्हती. पण कोल्हाही चतुर होता. त्यानं धडपड करून करून त्या जाळ्याला भोक पाडलं आणि त्याला जोर लावून लावून बरंच मोठं केलं. पण या धडपड उद्योगात त्याची शेपटी तुटली. पण जाळ्यात राहिलो तर आपला जीवच जाणार असा विचार करून कोल्ह्यानं कशीबशी स्वत:ची सुटका करून घेतली आणि घराकडे धूम ठोकली. पण शेपटी तुटल्यानं त्याला इतर कोल्हे मंडळींना भेटण्याची लाज वाटू लागली. शेपूट तुटका कोल्हाअसं त्याला बाकीचे कोल्हे चिडवतील याची भीती वाटू लागली. पण जंगलात राहायचं तर इतर कोल्ह्यांशी गाठभेट होणारच, मग करायचं काय? शेवटी कोल्ह्याला एक युक्ती सुचली. खरं म्हणजे कोल्ह्यानं इतर कोल्ह्यांना विश्वासात घेऊन आपण जिवावर बेतलेल्या संकटातून कसे निभावलो, हे सांगितलं असतं तर कुणी त्याला फार चिडवलं नसतं. पण कोल्हाच तो, अतिशहाणपणा करणारच ना?
 
कोल्ह्यानं ठरवलं की, आपण सर्व कोल्हेभाऊ-कोल्हेबहिणींची सभा घेऊ आणि त्यांना आपण शहरात आपल्यासाठी नवं ब्युटी पार्लर उघडल्याचं सांगू. तिथं कोल्ह्यांच्या शेपटय़ा फुकटात कापून मिळतात असं सांगू.
 
त्यानुसार त्यानं जंगलातल्या सर्व कोल्हेभाऊ-कोल्हेबहिणींची सभा बोलावली. सर्व जमल्यावर शेपूट तुटका कोल्हा त्यांना सांगू लागला, ‘‘माय-बापांनो, भाऊ-बहिणींनो आणि सग्यासोय-यांनो, मी आज तुम्हाला एक खुशखबर सांगणार आहे. जवळच्या शहरात खास आपल्यासाठी एक नवंकोरं ब्युटी पार्लर सुरू झालं आहे. तिथं आपल्याला केस, नखं कापून मिळतात. आणि ज्यांच्या शेपटय़ा बेढब आणि बेंगरूळ आहेत, त्याही कापून मिळतात. मुख्य म्हणजे या सर्व सोयी अगदी फुकटात आहेत. त्यामुळे मी माझी बेढब-बेंगरूळ शेपटी कापून घेतली आहे. ही पहा. तेव्हापासून मला खूपच बरं आणि हलकं हलकं वाटतंय. नाहीतरी शेपटीचा आपल्याला काही उपयोग नसतो. उगाच जिवाला भार असते ती शेपटी! म्हणून मी ती कापून टाकली. शहरातल्या माणसांना कुठं असतात शेपटय़ा? पण तरीही ती किती गोंडस आणि रूबाबदार दिसतात! त्यामुळे मी तुम्हाला सांगेन की, जमाना आता बदलला आहे. तुम्ही माझ्यासारख्याच स्वत:च्या बेंगरूळ शेपटय़ा कापून टाका आणि माझ्यासारखे स्मार्ट व्हा! कसं?’’
 
कोल्ह्याच्या या अजब भाषणावर काही नुकत्याच बाळसं धरू लागलेले शेपटय़ावाले तरुण कोल्हे खूश झाले, तर काही म्हातारे जाणकार कोल्हे हसू लागले. तेवढय़ात एक हुशार कोल्हा उभा राहिला. तो बोलू लागला, ‘‘ मित्रांनो, या कोल्ह्याची जंगलात काहीतरी उपद्व्याप करताना शेपटी तुटली आहे. त्याला आपण हसू म्हणून हा शेपटय़ा कापून देणाऱ्या ब्युटी पार्लरची बतावणी करतोय. अहो, कोल्ह्याचं खरं सौंदर्य त्याच्या झुपकेदार आणि गोंडस शेपटीमध्येच असतं. शेपटी काही कामाची नसते, हे खरं पण ती नसली तर तुम्हाला कोणी कोल्हाही म्हणणार नाही. जंगलातल्या कुठल्या प्राण्याला शेपटी नसते? तेव्हा हा शेपूट तुटका कोल्हा कोण मोठा शहाणा लागून गेलाय, शेपूट कापा म्हणणारा? तुम्हाला इतिहासातल्या शायिस्तेखानाची गोष्ट माहीतच असेल. पुण्याच्या लाल महालात लपलेल्या शायिस्तेखानावर शिवाजी महाराजांनी रात्रीच्या अंधारात हल्ला केला तेव्हा, त्याला पळता भुई थोडी झाली. खिडकीतून उडी टाकताना शिवाजी महाराजांनी तलवारीनं त्याच्या एका हाताची बोटंच कापून टाकली. तसाच काहीतरी प्रसंग आपल्या या कोल्हेभाऊवर गुदरलेला दिसतो. पण तो सांगायची त्याला लाज वाटते, म्हणून तो अशा थापा मारतोय. तुम्ही त्याला अजिबात भुलू नका. अहो, शहरात माणसांसाठी ब्युटी पार्लर असतात आणि प्राण्यांसाठी प्राणीसंग्रहालय असतं. तिथं आपल्याला डांबून ठेवतात. आणि माणसांच्या पिलांपुढे वाकडय़ातिकडय़ा उडय़ा मारून दाखवाव्या लागतात. जंगल हेच आपलं घर आहे आणि शेपटी आपला प्राण आहे.’’
 शेपूट तुटक्या कोल्ह्याची या भाषणानं ज्यामच पंचाइत झाली. सगळे त्याला कोल्हा शेपूट तुटका, मारतोय मटका, मारतोय मटका!असं म्हणून चिडवू लागले. त्यामुळे शेपूट तुटक्या कोल्ह्यानं तिथून पळ काढला.

Tuesday 24 April 2012

दांडगीनं उचलला हत्ती!

एक असते मुंगी. तिचं नाव दांडगी. नावाप्रमाणेच ती चांगलीच खोडकर म्हणजे दांडगट होती. तिनं काही खोडी केली की, तिची आई तिला नेहमी हत्तीची भीती घालायची. थांब, तुझं नाव आता हत्तीदादालाच सांगते. तो माझा भाचा आहे. तो आपल्या घरी आला की, तुला त्याच्या सोंडेनं उचलून उंच झाडावर टांगून ठेवीन. मग बस बोंबलत.असं आई दांडगीला म्हणायची. पण हा हत्तीदादा काही तिला दिसायचा नाही.
 
सुरुवाती-सुरुवातीला दांडगी पण हत्तीदादाचं नाव घेतलं की, ज्याम घाबरायची. आईच्या पदराआड लपून बसायची. आणि मग हळूच वाकून हत्तीदादा आलाय का ते पाहायची. पण तो काही दिसायचा नाही. मग जरा वेळ ती परत आईच्या पदराआड लपून राहायची. मग परत वाकून पाहायची. पण मेला, हत्तीदादा काही यायचाच नाही. मग दाडंगी आईला म्हणायची,
 
कुठंय ग तुझा तो हत्तीदादा? अजून आला नाही?’
 
आई तिला जवळ घेत म्हणायची, ‘तू शांत बसलीस ना म्हणून तो आला नाही. यायला निघाला होता, पण तू शांत बसल्यामुळे परत घरी गेला.
 
दांडगी म्हणे, ‘चल, काहीतरीच सांगतेस.
 
आई म्हणे, ‘तुला एके दिवशी कळेल तो आल्यावर. त्याला मी सांगून ठेवलंय तुझं नाव.
 
मग दांडगी मोठ्या मुंग्यांसारखं वागायचं आपण उद्यापासूनअसं ठरवायची. पण जरा वेळानं ती ते विसरून जायची. मग परत तिचा दांडगटपणा सुरू व्हायचा. अन्न शोघत फिरणा-या मुंग्यांच्या रांगेत दगड टाकून त्यांचा रस्ता अडवून टाक, वाट चुकलेल्या एखाद्या मुंगीला चुकीचा रस्ता सांग, एखाद्यी मुंगीनं अन्नाचा कण ढकलत ढकलत घराकडे नेत असेल तर दांडगी तो अन्नाचा कण दुस-या बाजूनं ओढून त्या मुंगीला बेजार करायची.
 
या खोड्यांमुळे सगळे मुंगे आणि मुंग्या दांडगीच्या आईकडे तिची तक्रार करायच्या. आई तिला रागं भरायची. पण दांडगी मी काही केलं नाही, हे खोटं खोटं सांगत आहेतअसं म्हणून रडण्याचं नाटक करायची. त्यामुळे आईलाही तिचंच खरं वाटायचं. परिणामी दांडगीच्या खोड्या वाढतच चालल्या होत्या.
 
एके दिवशी खरोखरच हत्तीदादा दांडगीच्या घरी आला. दांडगीची आई त्याची आत्या होती, म्हणून तो तिची ख्यालीखुशाली विचारायला आला होता. दांडगीला वाटलं, आई आपल्याला रोज भीती घालते, तोच हा हत्तीदादा असावा. म्हणून त्याला पाहताच ती कोप-यात दडून बसली.
 
दांडगीची आई आणि हत्तीदादा बराच वेळ बोलत होते. हळूहळू विषय दांडगीच्या खोडकरपणाकडे वळला. तिची आई हत्तीदादाला दाडंगी कसं जेरीस आणते ते रंगवून रंगवून सांगू लागली. मग हळूच म्हणाली की, तुझं नाव घेऊन मी तिला रोज भीती घालते. पण तू काही येत नाही, म्हणून ती आता तुझ्या नुसत्या नावाला घाबरेनाशी झालीय. ती घरी आली की, तू तिला जरा भीती घाल. म्हणजे तिच्या खोड्या दोन-चार दिवसांपुरत्या तरी कमी होतील.
 
हत्तीदादा म्हणाला, ‘अग ताई, मी अगडबंब दिसत असलो तरी मला लहान मुलं खूप आवडतात. मला काही लहान मुलांना भीती घालता येत नाही.
 
दांडगीची आई म्हणाली, ‘अरे, आपलं नुसतं तिला घाबरायचं थोडंसं नाटक कर.
 कोप-यात बसून दांडगी सगळं ऐकत होती. मग ती हळूच लपत लपत बाहेर गेली. आणि तिनं बाहेरून आई, मी आलेम्हणत उड्या मारत एकदम हत्तीदादाच्या पायावरच पाय दिला. त्यामुळे हत्तीदादा जोरात किंचाळला. दांडगीनं घाबरून आपला पाय काढून घेतला. हत्तीदादा म्हणाला, ‘काय दांडगट आणि वजनदार पोर आहे ग तुझी? माझा पाय पार चेंगरून गेला.
तरी त्यानं आधी ठरल्यानुसार दांडगीला घाबरायचं नाटक करायला सुरुवात केली. पण आता दांडगीला कळलं होतं की, हा हत्तीदादा दिसतो अगडबंब, पण याच्या आतमध्ये नुसता भुस्सा भरलाय.
 
हत्तीदादा तिला म्हणाला, ‘थांब, तुला आता उचलून या उंच झाडावरच टांगतो.
 तेवढ्यात दांडगी त्याच्या पायात लपली. हत्तीदादाला ती दिसेना. मग तो मान वळवून इकडेतिकडे शोधू लागला. तेवढय़ात दांडगीनं जोर लगाके हय्याम्हणत हत्तीदादाचे दोन्ही पाय उचलले. हत्तीदादाला कळेपर्यंत दाडंगीनं हत्तीदादाला पार डोक्याच्या वर उचलला होता. हे पाहून हत्तीदादा पार घाबरून गेला. आणि मला खाली ठेव, अगं मी पडलो तर मरेनअसं म्हणत गयावया करू लागला. दाडंगीची आई तर तिचा हा पराक्रम पाहून अचंबित झाली. तिची दातखिळीच बसली. आणि हत्तीची पण बसायची वेळ आली होती.

Friday 23 March 2012

तोत्तोचानची, नव्हे तुमची गोष्ट!

दोस्तांनो, तुम्ही तोत्तोचानहे पुस्तक वाचलंय की नाही? तोत्तोचान ही तुमच्यासारखीच छोटीशी मुलगी. तिला तिच्या पहिल्या शाळेतून काढून टाकलं जातं. मग तिची आई तिला नव्या शाळेत घालते. या नव्या शाळेत रेल्वेच्या डब्यासारखे वर्ग असतात. या शाळेचे मुख्याध्यापकही वेगळे असतात आणि शिक्षकही. पण ती सगळीच गंमत सांगण्यात मज्जा नाही. ती तुम्ही प्रत्यक्ष वाचायला हवी. कारण हे असं पुस्तक आहे की, वाचणारा प्रत्येक जण त्याच्या प्रेमात पडतो.
 
माहितेय या पुस्तकाच्या आत्तापर्यंत कितीतरी आवृत्त्या निघाल्या आहेत, जगातल्या कितीतरी भाषांमध्ये त्याचा अनुवाद झाला आहे! कितीतरी भाषांतल्या मुलांच्या पुस्तकांत तोत्तोचानमधील धडे नेमले आहेत. मराठीमध्येही आत्तापर्यंत या पुस्तकाच्या अनेक आवृत्त्या झाल्या आहेत. गुजराती, बंगाली, हिंदी, तमिळ, तेलुगू या भाषांमध्येही या पुस्तकाचा अनुवाद झाला आहे.
 
म्हणजे हे पुस्तक अफाट लोकप्रिय झालं. तेत्सुको कुरोयानागी या जपानी मुलीनं हे पुस्तक लिहिलं आहे. ही मुलगी तोमाईया लहान मुलांच्या शाळेत शिकत होती. सोसाकु कोबायाशी हे या शाळेचे मुख्याध्यापक होते. हीच ती शाळा जिचे वर्ग रेल्वेच्या डब्यासारखे होते. 1945 साली ही शाळा आगीत सापडून नष्ट झाली आणि तिचे मुख्याध्यापक सोसाकु कोबायाशी यांचं 1963 साली निधन झालं. म्हणजे आता ती शाळाही नाही आणि त्या शाळेचे शिक्षकही नाहीत. पण जेव्हा तुम्ही हे पुस्तक वाचायला लागाल, तेव्हा तुम्हाला वाटेल की आपली शाळाही अशीच असली पाहिजे आणि आपले शिक्षक-बाई अशाच पाहिजेत.
 
कारण आपण तोत्तोचानसारखेच असतो. आपण अभ्यास करतो. पण फार अभ्यास करायचा आपल्याला कंटाळा येतो. तसा फार खेळायचा कंटाळा येत नाही. म्हणून आपण अभ्यास कमी करतो आणि खेळतो खूप. हे काही बरोबर नाही, असं आई-बाबा आपल्याला सांगत असतात. पण मोठय़ा माणसासारखं मान मोडून अभ्यास करण्याचं आपलं वय थोडंच असतं. मोठी माणसं आपली सारखी सांगत असतात शहाण्यासारखं वाग, शहाण्यासारखं वाग. पण शहाण्यासारखं वागायला आपण थोडेच मोठे असतो? मोठी माणसंही कधीतरी लहान असतात ना? तेव्हा ती किती शहाण्यासारखी वागतात? पण आपल्यामागे सारखी धोशा लावतात, ‘अमूक कर, तमूक करू नको. आता अभ्यास कर, खेळ बास.सतराशे साठ सूचना आणि तक्रारी. त्यामुळे आपल्याला कधी कधी त्यांचा राग येतो.
 आपण मुलंच थोडी हट्टी असतो असं नाही काही. आई-बाबाही हट्टी असतात. त्यामुळे तोत्तोचानहे मुलांनी आणि त्यांच्या आई-बाबांनीही वाचायचं पुस्तक आहे. खरं तर ते दोघांनी मिळून वाचलं पाहिजे. कारण तोमाई शाळा, तोत्तोचान आणि तिचे शाळेतले मित्र या सर्वाची ही गोष्ट फार म्हणजे फार मजेशीर आहे.
  • तोत्तोचान : तेत्सुको कुरोयानागी
    मराठी अनुवाद चेतना सरदेशमुख गोसावी
  • नॅशनल बुक ट्रस्ट, प्रभादेवी
  • पाने : 150, किंमत : 50 रुपये

Saturday 3 March 2012

पोर उडाला भुर्रर!

सगळ्याच मावश्या फार प्रेमळ असतात! हो की नाही? तुमची मावशी पण तुमच्यावर खूप खूप प्रेम करत असणार आणि तुमचे लाडही खूप करत असणार! नाही म्हणू नका, आम्हाला माहीत आहे!  आता, एखादी मावशी काकूसारखी किंवा मामीसारखी खडूस असणार म्हणा. त्यामुळे दोन-तीन मावश्या असलेल्या जास्त चांगल्या. म्हणजे त्यातली एखादी तरी आपले लाड करते! पण आपल्याला किती मावश्या असणार हे आपण कसं ठरवणार? पण ते जाऊ द्या, आज तुम्हाला एका वेगळ्या मावशीची ओळख करून देतो.
 
ही मावशी साधीसुधी नाही. म्हणजे ती खडूस वगैरे नाही, तर फार चांगली आणि प्रेमळ आहे. शिवाय ती खूप चटपटीत आहे. सदा आपल्या कामात असते. रोज नवीन नवीन फुलांची नक्षी असलेले घागरे आणि त्यावर छानशी ओढणी असा पाहताच मन प्रसन्न करणारा पोशाख ती करते. त्यामुळे ती गावातल्या सगळ्या पिटुकल्या उंदरांची लाडकी आहे. गावाबाहेरच्या जुन्या आंब्याच्या बुडाशी तिचं दुकान आहे. या दुकानात ती छोटुकल्या पिटुकल्यांसाठी खाऊ आणि खेळणी विकते. त्यामुळे तिच्या दुकानात सतत गर्दी असते. पण मोठय़ा बायकांसाठीही तिच्या दुकानात काही वस्तू असतात. म्हणजे सुया, दो-यांची रिळे, बटणं, झालरी, हुक वगैरे. त्यामुळे शेजारपाजारच्या बायाबापडय़ाही तिच्या दुकानात येतात.
 
..तर या मावशीचं नाव आहे, बेगम गुलाबो. किती गोड नाव आहे की नाही?
 
पावसाळा संपला. आता लवकरच हिवाळा सुरू होणार होता. त्यामुळे बेगम गुलाबो मावशीनं बाजाराला जायची तयारी केली. तिला बाजारातून बऱ्याच वस्तू विकत घ्यायच्या होत्या दुकानासाठी. मावशीनं लाल घाग-यावर फुलाफुलांचा कुडता घातला, वर पिवळीधम्मक ओढणी घेतली, एका हातात मोठी पिशवी घेतली आणि मावशी निघाली बाजाराला..
 
मावशी तिच्या घरापासून चार पावलं चालते न चालते तोच भुरेमियाँची गोडी आली. हा मियाँही मावशीसारखाच चांगला आहे. तो म्हणाला, ‘मावशी, बस माझ्या गाडीत.मावशी बसली. वाटेत आणखी बरेच लोक बसले. भुरेमियाँची गाडी बाजारात पोचली. मावशीनं लगबगीनं गाडीतून उडी मारून खरेदीला सुरुवात केली. बाजारातल्या सगळ्या दुकानदारांबरोबर तिच्या ओळखी होत्या. त्यामुळे त्यांच्याशी गप्पाटप्पा करत मावशीनं झटपट खरेदी केली. मावशीनं स्वत:साठी एक छानशी साडीही घेतली. ती आता गाडीकडे निघणार, तेवढय़ात तिचं लक्ष एका दुकानाकडे गेलं. त्या दुकानात वेगवेगळे फुगे सगळीकडे लटकत होते. मावशी ते फुगे पाहून खुश झाली. मनात म्हणाली, ‘अरे, हे फुगे गावातल्या मुलांना खूप आवडतील. ते विकत घ्यायला त्यांची माझ्या दुकानात झुंबड उडेल.मग मावशीनं एकेका रंगाचे दोन दोन फुगे घेतले.
 भुरेमियाँच्या गाडीत बसून मावशी सगळ्यांबरोबर घरी आली. दुस-या दिवशी सकाळी सकाळी तिनं आपलं दुकान उघडलं. त्यात बाजारातून आणलेल्या वस्तू लावायला सुरुवात केली. तेवढय़ात खुडबुड खुडबुडअसा आवाज येऊ लागला. मावशीला कळेना, हा आवाज कुठून येतोय. आधी तिला वाटलं दुकानातल्या एखाद्या बरणीत गांधीलमाशी अडकून पडली असावी. तिनं सगळ्या बरण्या पाहिल्या, पण तिला काहीच दिसलं नाही. मग तिनं परत दुकान लावायला सुरुवात केली. पण परत खुडबुड खुडबुडअसा आवाज येऊ लागला. तेवढय़ात  मावशीनं फुग्यांकडे आपला मोर्चा वळवला. तिला वाटलं, हे फुगे दुकानाच्या बाहेरच्या बाजूला लावले तर पोरांना ते दिसतील आणि मग ते त्यांच्या आयांकडे फुगे घेण्यासाठी टुमणं लावतील. मावशी फुग्याजवळ गेली तशी एका फुग्यातूनच खुडबुड खुडबुडअसा आवाज येत होता. मावशीनं नीट पाहिलं तर एका फुग्यात एक छोटासा मुलगा होता. तो मावशीला म्हणाला, ‘मला बाहेर काढा ना..मी कधीचा अडकून पडलोय या फुग्यात.मावशीनं एका सुईनं फुग्याला भोक पाडलं, तसा फुगा फुटला आणि तो छोटा मुलगा बाहेर आला. त्या मुलाला इवले इवले पंख होते.
तो इवला पोर म्हणाला, ‘‘मी सूर्याच्या किरणात राहतो. आम्हाला खेळण्यांच्या दुकानात जायचं होतं. म्हणून आम्ही शिडी लावून एका दुकानात उतरलो. मग मी मित्राबरोबर लपाछपी खेळत होतो. मी एका फुग्यात जाऊन लपलो. तर तिथं कुणीतरी आलं आणि त्यानं त्या फुग्यात हवा भरून त्याचं तोंड बंद करून टाकलं. त्यामुळे मी आत अडकून पडलो. पण आता मी घरी कसा जाणार, माझी शिडी तर त्या खेळण्यांच्या दुकानातच राहिली?’’
 मावशी त्याला म्हणाली, ‘‘काळजी करू नकोस. उद्या तुला त्या दुकानात घेऊन जाईन. मग तू शिडीवर चढून आपल्या घरी जा.’’ मग रात्री तो इवल्या इवल्या पंखांवाला मुलगा मावशीच्या घरात झोपला. सकाळी मावशीनं त्याच्यासाठी छान नाश्ता बनवला. मग चिमणेदादाला त्याला खेळण्यांच्या दुकानात घेऊन जायला सांगितलं. जाताना मावशीनं त्याला आपल्या दुकानातला छोटासा ढोल भेट दिला. मग तो इवल्या इवल्या पंखांचा पोर चिमणेदादाच्या पाठीवर बसून भुर्रर उडाला..
पण तो खेळण्याच्या दुकानात पोचला का? शिडीवर चढून सूर्याच्या घरी गेला का? याच्यासाठी तुम्ही बेगम गुलाबो मावशीचं हे पुस्तकच वाचा. मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं आहे की, मावश्या प्रेमळ असतात. बेगम गुलाबो मावशी तर फार फार प्रेमळ आहे. तुम्ही कधी तिच्या घरी गेलात तर ती तुमचंही असंच स्वागत करेल.
 
पण आधी तिची ओळख करून घ्या. बाजारात लाल घाग-यावर फुलाफुलांचा कुडता घातलेली आणि पिवळीधम्मक ओढणी घेतलेली कुणी बाई दिसली तर ती बेगम गुलाबो मावशीच असणार, हे लक्षात ठेवा!
  • बेगम गुलाबो मावशी आणि तिचे फुगे : क्वादसिया झैदी, मराठी अनुवाद मुकुंद टाकसाळे
  • नॅशनल बुक ट्रस्ट, प्रभादेवी, मुंबई
  • पाने : 24, किंमत : 15 रुपये

Friday 24 February 2012

गोष्ट जिद्दी ष्वांगच्या पराक्रमाची!

युआन ष्वांगबद्दल तुम्ही कधी ऐकलं आहे का? ष्वांग हा खूप हुशार बौद्ध धर्मगुरू होता. इ. स. 630 म्हणजे म्हणजे 1383 वर्षापूर्वी या जिद्दी धर्मगुरूनं भारताचा प्रवास करायचा ठरवला. त्या काळी आत्ताच्यासारखी काही प्रवासाची साधनं नव्हती. विमानाचा शोध ही तर खूपच अलीकडची गोष्ट आहे. त्यामुळे सारा प्रवास व्हायचा तो पायी किंवा घोडय़ावरून. शिवाय चीनमधून भारतात येण्यासाठीही सरळ असा रस्ता नव्हता. त्यासाठी अनेक डोंगरं, दऱ्या आणि वाळवंटांचा आडवातिडवा प्रवास करावा लागे. वाटेत लुटारूंच्या टोळ्या असत. त्या प्रवाशांना लुटून त्यांच्याकडील सगळ्या मौल्यवान वस्तू, पैसे हिसकावून घेत. कधी कधी प्रवाशांना ठारही मारत. नद्या ओलांडणं आणि बर्फातून प्रवास करणं हेही तेव्हा वाटतं तितकं सोपं नव्हतं.
 
अशा काळात ष्वांगनं भारतात येऊन इथल्या बौद्ध धर्मग्रंथांचा अभ्यास करायचा ठरवलं. ष्वांग निश्चयाचा पक्का होता. एकदा ठरवलं की, ती गोष्ट तो पूर्ण करत असे. मग वाटेत कितीही संकटं येवोत अगर काही होवो. ष्वांग काही डगमगणारा गडी नव्हता. त्याला भारतातील विद्वान पंडितांकडून बौद्ध धर्मशास्त्रांचा अभ्यास करायचा होता आणि ते धर्मग्रंथ चीनला घेऊन जायचे होते.
 त्या काळात भारतात बौद्ध धर्माचा खूप प्रभाव होता. आणि बौद्ध धर्माविषयीचं खूप साहित्यही भारतात होतं. ते पाहण्यासाठी आणि त्यांचा अभ्यास करण्यासाठी भारतात येणं गरजेचं होतं. पण त्या काळी चीनमध्ये देश सोडून जाण्याला परवानगी नव्हती. पण ष्वांग खूप लोकप्रिय आणि विद्वान धर्मगुरू होता. त्यामुळे त्याच्यावर प्रेम करणारे लोकही खूप होते. त्यांच्या मदतीनं ष्वांगनं भारतात येण्याची योजना आखली. पण हा सारा प्रवास त्यायला चोरीछुपे करावा लागणार होता. पकडलं गेलं तर शिक्षा होण्याचीही भीती होती. पण ष्वांगनं काहीही झालं तरी भारतात जायचंच, असा चंगच बांधला होता. मग त्यानं दोन वाटाडय़ांना सोबत घेऊन चीनमधून बाहेर पडण्याच्या प्रयत्न केला. चीनच्या सीमेपर्यंत आल्यावर ते ष्वांगचे दोन्ही वाटाडे गुप्तहेरांच्या ससेमि-याला घाबरले. त्यामुळे ष्वांगने त्यांना तिथेच सोडून एकटय़ानंच सीमा ओलांडायचं ठरवलं. पण तेही काही सोपं नव्हतं. सीमेवर काही मैलांच्या अंतरावर उंच मनो-यावर सशस्त्र पहारेकरी पहारा देत असत.
ष्वांग त्यांच्या तावडीतून सुटतो. पण त्याला भारताकडे जाणारा रस्ताही धड माहीत नसतो. पण म्हणतात ना तुमचा निश्चय पक्का असेल आणि त्यासाठी भरपूर मेहनत घ्यायची तुमची तयारी असेल तर तुम्हाला काहीही शक्य होतं. ष्वांग अगदी तसाच गडी होता. भारतात पोहचेपर्यंत त्याच्या मार्गात अनेक संकटं आली, अनेकदा त्याच्या जिवावर बेतलं, जो जिथे जिथे थांबला तेथील सरदार-राजांनी त्याला त्यांच्याकडेच राहण्याचा आग्रह केला. त्याबदल्यात भरपूर संपत्ती देण्याचं आमिष दाखवलं. पण ष्वांग कशालाही बधला नाही.
 अखेर ष्वांग काश्मीरमध्ये पोहोचतो. येथील निसर्गसौंदर्य पाहून तो खूप खुश होतो. त्या वेळच्या काश्मीरमधील लोकांविषयी त्यानं लिहून ठेवलं आहे की, ‘पुरुष कापडाची एक लांबलचक पट्टी कमरेभोवती गुंडाळून बगलेपर्यंत घेतात व उजवा खांदा उघडाच ठेवतात. स्त्रिया दोन्ही खांदे झाडून टाकणारा असा लांब पायघोळ झगा घालतात..’ काश्मीरमध्ये ष्वांग दोन वर्षे राहतो. मग जालंधर आणि कुलूची तीर्थयात्रा करतो. नंतर मथुरेला येतो. वाराणसी, कपिलवस्तू, बोधगया असा प्रवास करतो. त्या वेळी गयामधील नालंदा हे विद्यापीठ खूप प्रख्यात होतं. नालंदामध्ये ष्वांग अनेक बौद्ध धर्माच्या आणि हिंदू धर्माच्या ग्रंथांचा अभ्यास करतो.
 ष्वांग भारतात यायला निघतो तेव्हा ते अवघा 28 वर्षाचा तरुण असतो. सुमारे तेरा वर्षे भारतात विविध ठिकाणी प्रवास करून, अनेक ग्रंथांच्या प्रती नकलून तो स्वत:बरोबर घेतो. इ. स. 645 मध्ये ष्वांग चीनला परत जातो. चीनचा सम्राट त्याचं खूप भव्यदिव्य स्वागत करतो. ष्वांगनं भारतातून आपल्यासोबत 657 ग्रंथ आणलेले असतात. पुढच्या काळात त्यांचं चिनी भाषेत भाषांतर, संपादन आणि लेखन करण्यात तो आपलं आयुष्य घालवतो.
 ष्वांग हे एका जिद्दीचं नाव आहे. ष्वांगचं हे पुस्तक का वाचायचं? तर या त्याच्या पुस्तकातून ष्वांगची आपल्या कामावरची निष्ठा काय होती? त्यासाठी त्यानं किती आणि कसे कष्ट घेतले? कोणकोणत्या संकटांचा सामना केला? भारतात तेरा वर्षे राहून त्यानं कसा अभ्यास केला? आणि भारतातून सोबत नेलेल्या ग्रंथांचं चिनी भाषेत कसं भाषांतर केलं? हे सगळं जाणून घेता येतं. शिवाय ष्वांगनं आपल्या या चीन ते भारत आणि भारत ते चीन प्रवासाची हकिगत लिहून ठेवली आहे. त्यातून त्या वेळचा भारत कसा होता? इथे कोणकोणते राजे होते? ते चांगले होते की वाईट होते? त्या वेळचे लोक कसे होते? ते कसे राहत? अशा अनेक गोष्टी समजतात.
पुस्तक वाचून हजार वर्षापूर्वी आणि त्याही आधीचे लोक कसे होते हे समजावून घेता येतं. थोडक्यात ष्वांगच्या पुस्तकातून हजार वर्षापूर्वीचा भारतच समजून घेता येतो. म्हणून हे वाचायचं.
 
  • युआन ष्वांगची भारत यात्रा : बेलिंदर आणि हरिंदर धनोआ, मराठी अनुवाद निर्मला चंद्रकांत
  • नॅशनल बुक ट्रस्ट, विभागीय ऑफिस, प्रभादेवी, मुंबई
  • पाने : 62, किंमत : 11 रुपये

Thursday 16 February 2012

या पेन्सिलींशी करा दोस्ती!

हे एक छान पुस्तक आहे.
ही गोष्ट आहे एका चिमुरडीची.
घरातले सगळे लोक टीव्ही पाहत असतात. तिच्याशी कुणीच खेळत नाही की, बोलत नाही. ती ज्याम कंटाळून जाते. मग वैतागून खुर्चीवर चढून टीव्हीच बंद करून टाकते.
पण त्यामुळे आई तिच्यावर रागावते. बाबा डोळे मोठे करतो आणि दादा परत टीव्ही चालू करतो.
आई ऑफिसातून घरी आली की सरळ स्वयंपाकघरात जाते आणि कामाला लागते. चिमुरडी आईच्या मागे मागे जाते. तेव्हा ती तिला उचलून एका खुर्चीवर ठेवते आणि परत आपल्या कामाला लागते. चिमुरडी बराच वेळ खुर्चीवर बसून आईचं काम संपण्याची वाट पाहते, पण ते काही संपत नाही. मग ती रडायला लागते. आई तिला उचलून घेते, लाडानं तिचा एक पापा घेते आणि तिला परत खुर्चीत बसवते.
आई जेवण बनवत असते तेव्हा चिमुरडीला तिचा चेहरा दिसत नाही. त्यामुळे चिमुरडी खूप नाराज होते.
दादा पण शाळेतून आल्यावर चिमुरडीशी खेळत नाही. त्याचं होमवर्क करत बसतो. चिमुरडी खूप वेळ त्याच्याजवळ बसून त्याचं होमवर्क संपण्याची वाट पाहते. पण खूप वेळ ते संपतच नाही. मग चिमुरडी खुर्चीच्या मागे जाऊन त्याची पेन्सिल घेऊन पळते. तो तिच्या मागे पळतो.
बाबा पण ऑफिसातून येतो, तेव्हा तिच्याशी खेळत नाही. पेपर वाचत बसतो. चिमुरडी खूप वेळ त्याचं पेपर वाचन संपण्याची वाट पाहते. पण खूप वेळ ते संपत नाही. मग चिमुरडी बाबाच्या जवळ जाऊन तो वाचत असतो, त्याच्यावर आपले हात ठेवते. बाबा तिच्याकडे पाहतो. तिच्या पोटाला गुदगुदल्या करतो. चिमुरडी हसायला लागते. बाबाही हसतो आणि पुन्हा पेपर वाचायला लागतो.
चिमुरडीला प्रश्न पडतो कुणीच का माझ्याशी बोलत नाही? कुणीच का माझ्याशी खेळत नाही?
चिमुरडी जमिनीवर पडून विचार करू लागली. पण ती चिमुरडीच. तिला विचार कसा करतात हे कुठं माहीत? ती खूप वेळ तशीच पडून राहिली. काय करावं हे तिला काही सुचत नव्हतं. ती तशीच कितीतरी वेळ पडून होती. मग अचानक तिच्या पायावर काहीतरी पडलं. ती एक हिरवी पेन्सिल होती. ती चिमुरडीला म्हणाली, ‘तू माझ्याशी खेळतेस का?’ चिमुरडीला त्या पेन्सिलीच्या बोलण्याची मोठी गंमत वाटली. तेवढ्यात टेबलावरच्या निळ्या, पिवळ्या आणि लाल पेन्सिलींनीही खाली उडय़ा मारल्या. चिमुरडीभोवती त्यांनी गोल रिंगण केलं.
हिरवी पेन्सिल म्हणाली, ‘तुला वाटत असेल तर खेळ आमच्याशी.
चिमुरडीला मोठं आश्चर्य वाटलं. पेन्सिली तिला म्हणाल्या, ‘हो, आपण चित्र काढायचा खेळ खेळू या.चिमुरडीला चित्र कसं काढायचं तेही माहीत नव्हतं. पेन्सिली तिला म्हणाल्या, ‘खेळून तर पहा, मोठी मज्जा येते हा खेळ खेळताना.
मग चिमुरडी आणि पेन्सिली चित्र काढू लागल्या. चिमुरडीला वाटलं आधी जेवण बनवणाऱ्या आईचंच चित्र काढू या. त्यासरशी हिरवी पेन्सिल तिच्या बोटांमध्ये येऊन बसली. चिमुरडीनं झटपट आईचे कपडे रंगवले. पिवळ्या पेन्सिलीनंही काही कपडे रंगवले. एका पेन्सिलीने आईचे केस रंगवले. सगळ्या पेन्सिली कामाला लागल्या. शिवाय त्यांचा कामाचा उरकही मोठा होता. त्यामुळे फटाफट चित्र तयार झालं. चित्र पूर्ण झाल्यावर चिमुरडीनं ते आईला दाखवलं. ते चित्रं अगदी आईसारखंच दिसत होतं. तिनं ते स्वयंपाकघरातल्या कपाटावर लावलं.
मग चिमुरडीनं पेपर वाचणाऱ्या बाबाचं, गृहपाठ करणा-या दादाचंही चित्र काढलं. ती त्यांना दाखवली. ती त्यांनाही खूप आवडली. बाबाला तर चित्र खूपच आवडलं. त्यानं ते भिंतीवर लावलं. दादालाही त्याचं गृहपाठ करतानाचं रंगीत चित्र खूप आवडलं. त्यानंही ते चित्र भिंतीवर लावलं. त्यामुळे चिमुरडी खूश झाली. आणि तिच्या पेन्सिलीही खूप खूप खूश झाल्या. आता तिच्याशी खेळायला आणि गप्पा मारायला लाल, पिवळ्या, हिरव्या, निळ्या अशा खूप पेन्सिली होत्या. त्या तिच्या मैत्रिणी झाल्या होत्या.
दोस्तांनो, तुम्हालाही कधी कधी खेळायला कुणी सोबती मिळत नसेल तर तर तुम्ही या चिमुरडीशी गप्पा मारू शकता. किंवा मग पेन्सिलीशी खेळू शकता. या रंगीत रंगीत पेन्सिली फार करामती आहेत. सारी कामं त्या फटाफट करतात आणि सुंदर सुंदर चित्रं काढतात. त्यामुळे मज्जा येते. तर मग येणार ना तुम्ही पेन्सिलीशी खेळायला?
जरूर या बरं!
मूळ इंग्रजी भाषेतल्या या पुस्तकाचा हिंदी अनुवाद मनीषा चौधरी यांनी केला आहे. संपूर्ण रंगीत असलेल्या या पुस्तकात खूप चांगली चित्रं आहेत.
मैं और मेरी रंगीन पेंसिल : मासुमेह अंसारियन
प्रथम बुक्स, नवी दिल्ली
पाने : २४, किंमत : २५ रुपये

Saturday 11 February 2012

चांदोबाचं हाय हाय, चिमणीचं बाय बाय


दोन होते बोकेआणि अरे अरे मोराही दोन्ही कवितांची पुस्तकं आहेत. यातल्या कविता तशा गमतीच्या आहेत,
दोन होते बोके
कपड्यांच्या दोरीला
घेत होते झोके
किंवा मोराही कविता पहा-
अरे अरे मोरा
काय तुझा तोरा
पहा जरा आकाशात
ढग आहे कोरा!

मोर पावसाची चाहूल लागली की नाचतो. पिसारा फुलवून मनसोक्त नाचतो. पण एरवी तो डौलात चालतो. त्याचा डौल पाहून एका मुलाला हा प्रश्न पडतो. तो मुलगा पुढे म्हणतो-

फुलवतो पिसारा छान
नाचतो ही छान
गाणे कसे ऐकतो
दिसत नाही कान!

एकदा एका माकडानं ऐटीत चालणारा माणूस पाहिला. त्याला वाटलं आपण अशीच ऐट करावी. पण ती करणार कशी? मग त्यानं एक शक्कल लढवली-

माकडाने पाहिली माणसाची ऐट
मग त्याने घेतली शिंप्याची भेट
सुटा-बुटाचं कापड आणलं
टुणटुण उडत माप दिलं
शिंप्याने शिवला होता सूट
माकडाला झाला होता फिट

मग काय, माकड तो सूट घालून सुटाबुटात फिरलं, पण जंगलात.
या पुस्तकातली मुंगी मोठी विसरभोळी आहे. तिच्या काही म्हणून लक्षातच राहात नाही.

घरातून जाताना
आई खूप सांगते
पण चालताना मुंगी
सगळं विसरून जाते
रस्त्यावर पडलेलं
खात पुढे जाते
इवल्या इवल्या पायांनी
तुरू तुरू चालते
काय काय बोलते
घरी जायचं तेवढं
ती विसरून जाते.

असंच गमतीचं एक फूल आहे. ते मुलींसारखी फॅशन करतं-

एक होतं फूल
त्याच्या कानात डूल
त्याला पडली भूल
भुंगा म्हणाला, बी कूल
कोंबडा, अस्वल, मनीमाऊ, चिमणी, परी, झुरळ, घार, गोगलगाय यांच्या कविताही अशाच गमतीच्या आहेत.
अरे अरे मोरायातही अशाच तीस कविता आहेत.

एक जोकर एका झाडीच्या फांदीवर जाऊन बसतो आणि गडबड होते-
एकदा झाडावर बसला एक जोकर
फांदीने त्याला मारली ठोकर
तसा त्याने दिला मोठा ढेकर
ढेकर ऐकून हसला नोकर
झाडावर होती माकडे पाच
जोकरने केला फांदीवर नाच
हलवली त्याने फांदी नुस्ती
पडली सारी माकडे खाल्ती

यातल्या सगळ्या कविता प्राण्या-पक्ष्यांच्याच नाहीत काही! काही कविता तुमच्या घराबद्दलही आहेत. ही पहा-

नळाला येतं
सकाळी पाणी
रेडिओवर लागतात
मराठी गाणी
आजोबा गातात
अभंगवाणी
आई दिसते
घराची राणी!
सकाळी असते
सर्वाना घाई
ऑफिसला जाते
बेबीताई

एके दिवशी चंद्राला हुक्की आली. रोज रोज आकाशात उंचावर राहून राहून त्याला फार कंटाळा आला. मग-

एक दिवस एक दिवस
असे काय झाले
ढगामधून चांदोमामा
हळूच खाली आले
आल्या आल्या चांदोमामा
बादलीमध्ये पडले
एवढय़ाशी पाण्यातसुद्धा
भिजून चिंब झाले
तळे समजून बादलीला
त्यात लागले बुडू
तळाला जाता जाता
त्याला आले रडू
शेवटी घरातल्या लोकांनी चांदोबाला बाहेर काढलं. चांदोबानं मग थेट घर गाठलं. मागेसुद्धा वळून पाहिलं नाही. त्याची चांगली खोड मोडली. पण चांदोबा घरी जातात न जातात तो एका विमानात चिमणी घुसली.
एकदा एक चिमणी
विमानात घुसली
विमानात गेल्यावर
तिथेच फसली
एअर होस्टेस तिला बघून
गोड गोड हसली
चिमणी विमानात बसून मस्त फिरून आली. विमान खाली येऊ लागले तेव्हा-
विमानाने जेव्हा मात्र
पुन्हा लँडिंग केले
चिमणीने हळूच तेव्हा
सा-यांना बाय बाय केले

पण तुम्ही या दोन्ही पुस्तकांना हाय हायकरा. म्हणजे तुम्हाला चिमणीसारखा मस्त प्रवास करता येईल. मनसोक्त प्रवास करून झाला की, सर्वाना असंच गोड बाय बायकरा. पण त्यासाठी पहिल्यांदा हायकरायला विसरू नका.

अरे अरे मोरा आणि दोन होते बोके : मोहन काळे
अक्षर चळवळ प्रकाशन, मुंबई
पाने : प्रत्येकी 40
किंमत : प्रत्येकी 45 रुपये

Thursday 2 February 2012

पाचबल रोलची दे धम्माल!

आज तुम्हाला एका चिनी पुस्तकाची ओळख करून देणार आहोत. मूळ चिनी पुस्तकाचं नाव आहे, फाइव्ह चायनीज ब्रदर्स. त्याचा हा मराठी अनुवाद आहे.
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
आज तुम्हाला एका चिनी पुस्तकाची ओळख करून देणार आहोत. मूळ चिनी पुस्तकाचं नाव आहे, फाइव्ह चायनीज ब्रदर्स. त्याचा हा मराठी अनुवाद आहे.
तर ही पाच चिनी भावांची गोष्ट आहे. हे पाचही भाऊ दिसायला सारखे होते. म्हणजे एकमेकांची डुप्लिकेट होते. सिनेमांत तुम्ही अनेकदा हिरोचा डबल रोल पाहता, पण या पुस्तकात तो पाचबल रोलआहे.
 
पाचही भाऊ दिसायला तसे ध्यान होते! म्हणजे सगळ्याच्या डोक्यावर काळी टोपी आणि लांबलचक बारीक वाढवलेली शेंडी. शिवाय ते कपडेही सारखेच घालायचे. त्यामुळे त्यांना पाहणा-यांना कळायचंच नाही की, त्यातलं कोण कुणासारखं आहे! पण हे भाऊ दिसायला थोडेसे बावळट ध्यान असले तरी मोठे हुशार होते.   म्हणजे त्या पाचही भावांकडे एकेक मजा होती. पहिला भाऊ समुद्राचं सगळं पाणी पिऊ शकायचा. दुस-या भावाची मान लोखंडाची होती. तिस-या भावाचे पाय खूप लांब लांब व्हायचे. म्हणजे तो त्याला हवे तेव्हा त्याचे पाय हवे तेवढे लांब करायचा आणि हवे तेव्हा कमीही करता यायचे. चौथा भाऊ आगीतून येऊ-जाऊ शकायचा. म्हणजे त्याला आग काहीही करू शकायची नाही. आणि पाचवा भाऊ त्याचा श्वास कितीही वेळ थांबून ठेवू शकायचा. आहे की नाही गंमत? म्हणूनच म्हटलं होतं की, हे पाचही भाऊ जरासे चमत्कारिकच होते. पण गुणी होते बिच्चारे!
 
हे पाचही भाऊ आपल्या आईसोबत समुद्राकाठच्या एका छोटय़ा घरात राहत होते.
 
पहिला भाऊ रोज सकाळी समुद्रावर मासे पकडायला जात असे. तो रोज खूप रंगीबेरंगी मासे पकडत असे. ते मासे गावातल्या बाजारात विकत असे. त्या माशांना खूप चांगली किंमत येई. एके दिवशी एक छोटा मुलगा त्याला म्हणाला, ‘मला तुमच्याबरोबर मासे पकडायला न्याल का?’ पहिला भाऊ म्हणाला, ‘नाही नेणार.पण त्या छोटय़ा मुलानं खूपच हट्ट धरला. मग पहिला भाऊ म्हणाला, ‘तिथं तुला माझं ऐकावं लागणार.तो मुलगा होम्हणाला. दुस-या दिवशी समुद्रावर गेल्यावर पहिला भाऊ त्या मुलाला म्हणाला, ‘तुझ्या लक्षात आहे ना मी सांगितलेलं?’ मुलानं मान डोलावली. मग पहिल्या भावानं समुद्राचं सगळं पाणी पिऊन टाकलं. सगळं पाणी संपल्यामुळे मासे  तडफडू लागले. हे पाहून तो छोटा मुलगा फार खुश झाला. तो नाचायला लागला. समुद्रातले शंख-शिंपले गोळा करू लागला. थोडय़ा वेळानं पहिल्या भावानं काही मासे पकडले. त्यानं समुद्राचं सगळं पाणी पिऊन टाकलं नव्हतं, नुसतं तोंडात घेतलं होतं. म्हणजे तुम्ही चूळ भरता ना तसं. आता बराच वेळ झाल्यामुळे त्याचं तोंड गळून आलं होतं. अख्या समुद्राचं पाणी तोंडात धरून ठेवणं चेष्टा आहे का राव? म्हणून त्यानं समुद्रातले शंख-शिंपले गोळा करणाऱ्या त्या छोटय़ा मुलाला बाहेर यायला सांगितलं, पण तो काही आला नाही. मग त्यानं खूप हातवारे करून त्याला बोलवायचा प्रयत्न केला. पण तो मुलगा काही त्याचं ऐकेना. पहिल्या भावाच्या तोंडात अख्या समुद्र सारखा बाहेर यायला उसळी मारत होता. शेवटी त्याला राहवलं नाही. त्यानं ते पाणी परत समुद्रात टाकायला सुरुवात केली. सगळं पाणी टाकल्यावर समुद्र परत काठोकाठ भरून गेला. त्यात तो छोटा मुलगा वाहून गेला. आता झाली का पंचाईत?
 
पहिला भाऊ एकटाच गावात परत आला. छोटा मुलगा वाहून गेल्याची शिक्षा म्हणून त्याचं डोकं छाटून टाकण्याची शिक्षा झाली. तेव्हा तो म्हणाला, ‘मला माझ्या आईला शेवटचं भेटू द्या.लोकांनी परवानगी दिली. तो घरी आला आणि त्यानं त्याच्या दुस-या भावाला पाठवलं. ते पाचही भाऊ दिसायला सारखे असल्यामुळे कुणाला काही कळलं नाही. या दुस-या भावाची मान लोखंडाची होती. त्यामुळे ती तलवारीनं कापली गेली नाही. मग त्याला समुद्रात बुडवायचं ठरलं. तेव्हा दुसरा भाऊ म्हणाला, ‘मला आईला शेवटचं भेटू द्या.घरी आल्यावर त्यानं तिस-या भावाला पाठवलं. ते पाचही भाऊ दिसायला सारखे असल्यामुळे कुणाला काही कळलं नाही. या तिस-या भावाचे पाय खूप लांब व्हायचे. त्यामुळे त्याला समुद्रात टाकलं, तेव्हा त्याने आपले पाय लांब करायला सुरुवात केली. ते त्याने इतके लांब केले की, त्याचं डोकं समुद्राच्या पाण्याबाहेर आलं, पाय समुद्राच्या तळाला टेकले.
 
मग लोकांनी त्याला जाळून टाकायचं ठरवलं. तेव्हा तिसरा भाऊ म्हणाला, ‘मला आईला शेवटचं भेटू द्या.घरी आल्यावर त्यानं चौथ्या भावाला पाठवलं. या भावाला आग काहीच करू शकत नसे. म्हणून तोही आग लावल्यावर जिवंत राहिला. आता लोक खूपच चिडले. त्यांनी त्याला आगीच्या भट्टीतच टाकायचं ठरवलं. सारे लोक आगीच्या भट्टीबाहेर उभे राहिले रात्रभर. सकाळी तो चौथा भाऊ डोळे चोळत बाहेर आला आणि त्या लोकांना म्हणाला, ‘रात्री काय छान झोप लागली मला!तेवढ्यात तिथे न्यायाधीश आले. ते त्याला जिवंत पाहून म्हणाले,‘तुला मारण्याचा आम्ही आटोकाट प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळी अपयश आलं. त्यामुळे तू निर्दोष आहेस हे सिद्ध होतं.
 
मग त्याला सोडून दिलं. तो चौथा भाऊ घरी आला. त्या दिवसापासून पाचही भाऊ आपल्या आईसोबत मजेत राहू लागले.
 पाच चिनी भाऊ : क्लेअर हचिट बिशपमराठी अनुवाद : नेहा सुगवेकरकजा कजा मरू प्रकाशन,द्वारा गरवारे बालभवन, पुणे
फोन : 020-24442109
पाने : 36, किंमत : 15 रुपये 

Monday 23 January 2012

नवाचा पाढा गप्पा झाडा!

भीम आणि घटोत्कचहा पहिलीच गोष्ट महाभारतातला भीम आणि त्याचा मुलगा घटोत्कच यांची आहे हे तुमच्या लक्षात आलं असेलच. घटोत्कच त्याच्या आईबरोबर, हिडिंबाबरोबर राहत असतो. तो खूपच ताकदवान असतो. कुस्तीत, मारामारीत आणि गदायुद्धात तो सगळ्यांना हरवत असे. त्यामुळे त्याचं त्याच्या मित्रांमध्ये खूप कौतुक होत असे. पण हा घटोत्कच खूप खात असे आणि व्यायामही करत असे. पण तो सकाळी लवकर उठत नसे. त्यामुळे त्याची एकदा ज्याम फजिती होते.
 
सापाचं स्वातंत्र्यही गोष्ट विशेषत: ज्या दोस्तांना दूध प्यायला आवडत नाही, त्यांना खूप आवडेल. कारण या गोष्टीत बोलका साप आहे. या सापाला दूध प्यायला खूप आवडायचं. त्यामुळे तो एका शाळेत जाणा-या मुलाशी मैत्री करतो. ते दोघं रोज खूप गप्पा मारतात, एकत्र दूध पितात. पण लक्षात ठेवा या सापाला दूध न पिणारी मुलं अजिबात आवडत नाहीत. आणि त्यांच्याशी तो मैत्रीही करत नाही.
 
ये ये पावसाही पावसाची गोष्ट आहे. सध्या काही पावसाचे दिवस नाहीत. कसे असणार दोस्तांनो? रोज रोज थंडी पडायला लागल्यावर पाऊस कुठून पडणार? पण पाऊस कसा पडतो, त्यासाठी हिमालय, वारा, सूर्य आणि पृथ्वी यांची कशी मैत्री व्हावी लागते, याची गोष्ट या गोष्टीत आहे. म्हणजे ही गोष्टीच्या गोष्टीची गोष्ट आहे.
 
तुम्ही शाळेतल्या पुस्तकात किंवा शिक्षकांकडून शेखचिल्लीची गोष्ट ऐकली असेल. एक शेखचिल्ली ज्या फांदीवर बसलेला असतो, तीच फांदी तो तोडत असतो. शेवटी फांदी तुटल्याबरोबर तो फांदीसह जमिनीवर आपटतो. शेखचिल्लीची गायया गोष्टीतला शेखचिल्ली तितका काही वेडा नाही. आणि तो लाकूडतोडय़ाही नाही. तर तो आहे राखणदार. तो एका बागेचं राखण करत असतो. पेरूच्या झाडाखाली मऊ मऊ कापसाची गंजी असते. त्यावर बसून तो रोज बागेत चरायला येणा-या एका गायीच्या शेपटीला धरून स्वर्गात जातो. तिथे खूप मजा करतो आणि परत येतो. कारण स्वर्गात राहणारी ही गाय रोज खाली उतरून शेखचिल्लीच्या बागेत चरायला येते आणि जाताना त्याला आपल्यासोबत घेऊन जाते. पण एके दिवशी तो बागेच्या मालकालाही आपल्यासोबत स्वर्गात जाऊन येण्याचा आग्रह करतो आणि गडबड होते. कारण राखणदार असला तरी हा शेखचिल्लीही आधीच्यासारखाच थोडासा वेडपट असतो. 
 
बोलक्या शंखाची गोष्टही अशीच गंमतीशीर आहे. पण खरी गंमत आहे ती नवाचा पाढाया कवितेत. ही कविता तुम्ही पाठ केली तर तुमचा नवाचा पाढाही तोंडपाठ होऊन जाईल. तर मग करा सुरुवात म्हणायला-
 
नवाच्या पाढय़ाची गंमतजमत, बेरजा सा-यांच्या नऊ
 
जरा विचार करून गणित करा रे, सगळेच नऊच नऊ
 
नऊ दुणे अठरा, एक आणि आठ झाले नऊ
 
जरा विचार करून गणित करा रे, सगळे नऊच नऊ
 
आहे की नाही गंमतजंमत? तेव्हा नवाचा पाढा तोंडपाठ म्हणण्यासाठी आणि बोलक्या सापाशी गप्पा मारण्यासाठी हे पुस्तक वाचा.
 
ये ये पावसा : लीना मेहेंदळे
 
परचुरे प्रकाशन मंदिर, मुंबई
 पाने : 50, किंमत : 40 रुपये