Friday 24 February 2012

गोष्ट जिद्दी ष्वांगच्या पराक्रमाची!

युआन ष्वांगबद्दल तुम्ही कधी ऐकलं आहे का? ष्वांग हा खूप हुशार बौद्ध धर्मगुरू होता. इ. स. 630 म्हणजे म्हणजे 1383 वर्षापूर्वी या जिद्दी धर्मगुरूनं भारताचा प्रवास करायचा ठरवला. त्या काळी आत्ताच्यासारखी काही प्रवासाची साधनं नव्हती. विमानाचा शोध ही तर खूपच अलीकडची गोष्ट आहे. त्यामुळे सारा प्रवास व्हायचा तो पायी किंवा घोडय़ावरून. शिवाय चीनमधून भारतात येण्यासाठीही सरळ असा रस्ता नव्हता. त्यासाठी अनेक डोंगरं, दऱ्या आणि वाळवंटांचा आडवातिडवा प्रवास करावा लागे. वाटेत लुटारूंच्या टोळ्या असत. त्या प्रवाशांना लुटून त्यांच्याकडील सगळ्या मौल्यवान वस्तू, पैसे हिसकावून घेत. कधी कधी प्रवाशांना ठारही मारत. नद्या ओलांडणं आणि बर्फातून प्रवास करणं हेही तेव्हा वाटतं तितकं सोपं नव्हतं.
 
अशा काळात ष्वांगनं भारतात येऊन इथल्या बौद्ध धर्मग्रंथांचा अभ्यास करायचा ठरवलं. ष्वांग निश्चयाचा पक्का होता. एकदा ठरवलं की, ती गोष्ट तो पूर्ण करत असे. मग वाटेत कितीही संकटं येवोत अगर काही होवो. ष्वांग काही डगमगणारा गडी नव्हता. त्याला भारतातील विद्वान पंडितांकडून बौद्ध धर्मशास्त्रांचा अभ्यास करायचा होता आणि ते धर्मग्रंथ चीनला घेऊन जायचे होते.
 त्या काळात भारतात बौद्ध धर्माचा खूप प्रभाव होता. आणि बौद्ध धर्माविषयीचं खूप साहित्यही भारतात होतं. ते पाहण्यासाठी आणि त्यांचा अभ्यास करण्यासाठी भारतात येणं गरजेचं होतं. पण त्या काळी चीनमध्ये देश सोडून जाण्याला परवानगी नव्हती. पण ष्वांग खूप लोकप्रिय आणि विद्वान धर्मगुरू होता. त्यामुळे त्याच्यावर प्रेम करणारे लोकही खूप होते. त्यांच्या मदतीनं ष्वांगनं भारतात येण्याची योजना आखली. पण हा सारा प्रवास त्यायला चोरीछुपे करावा लागणार होता. पकडलं गेलं तर शिक्षा होण्याचीही भीती होती. पण ष्वांगनं काहीही झालं तरी भारतात जायचंच, असा चंगच बांधला होता. मग त्यानं दोन वाटाडय़ांना सोबत घेऊन चीनमधून बाहेर पडण्याच्या प्रयत्न केला. चीनच्या सीमेपर्यंत आल्यावर ते ष्वांगचे दोन्ही वाटाडे गुप्तहेरांच्या ससेमि-याला घाबरले. त्यामुळे ष्वांगने त्यांना तिथेच सोडून एकटय़ानंच सीमा ओलांडायचं ठरवलं. पण तेही काही सोपं नव्हतं. सीमेवर काही मैलांच्या अंतरावर उंच मनो-यावर सशस्त्र पहारेकरी पहारा देत असत.
ष्वांग त्यांच्या तावडीतून सुटतो. पण त्याला भारताकडे जाणारा रस्ताही धड माहीत नसतो. पण म्हणतात ना तुमचा निश्चय पक्का असेल आणि त्यासाठी भरपूर मेहनत घ्यायची तुमची तयारी असेल तर तुम्हाला काहीही शक्य होतं. ष्वांग अगदी तसाच गडी होता. भारतात पोहचेपर्यंत त्याच्या मार्गात अनेक संकटं आली, अनेकदा त्याच्या जिवावर बेतलं, जो जिथे जिथे थांबला तेथील सरदार-राजांनी त्याला त्यांच्याकडेच राहण्याचा आग्रह केला. त्याबदल्यात भरपूर संपत्ती देण्याचं आमिष दाखवलं. पण ष्वांग कशालाही बधला नाही.
 अखेर ष्वांग काश्मीरमध्ये पोहोचतो. येथील निसर्गसौंदर्य पाहून तो खूप खुश होतो. त्या वेळच्या काश्मीरमधील लोकांविषयी त्यानं लिहून ठेवलं आहे की, ‘पुरुष कापडाची एक लांबलचक पट्टी कमरेभोवती गुंडाळून बगलेपर्यंत घेतात व उजवा खांदा उघडाच ठेवतात. स्त्रिया दोन्ही खांदे झाडून टाकणारा असा लांब पायघोळ झगा घालतात..’ काश्मीरमध्ये ष्वांग दोन वर्षे राहतो. मग जालंधर आणि कुलूची तीर्थयात्रा करतो. नंतर मथुरेला येतो. वाराणसी, कपिलवस्तू, बोधगया असा प्रवास करतो. त्या वेळी गयामधील नालंदा हे विद्यापीठ खूप प्रख्यात होतं. नालंदामध्ये ष्वांग अनेक बौद्ध धर्माच्या आणि हिंदू धर्माच्या ग्रंथांचा अभ्यास करतो.
 ष्वांग भारतात यायला निघतो तेव्हा ते अवघा 28 वर्षाचा तरुण असतो. सुमारे तेरा वर्षे भारतात विविध ठिकाणी प्रवास करून, अनेक ग्रंथांच्या प्रती नकलून तो स्वत:बरोबर घेतो. इ. स. 645 मध्ये ष्वांग चीनला परत जातो. चीनचा सम्राट त्याचं खूप भव्यदिव्य स्वागत करतो. ष्वांगनं भारतातून आपल्यासोबत 657 ग्रंथ आणलेले असतात. पुढच्या काळात त्यांचं चिनी भाषेत भाषांतर, संपादन आणि लेखन करण्यात तो आपलं आयुष्य घालवतो.
 ष्वांग हे एका जिद्दीचं नाव आहे. ष्वांगचं हे पुस्तक का वाचायचं? तर या त्याच्या पुस्तकातून ष्वांगची आपल्या कामावरची निष्ठा काय होती? त्यासाठी त्यानं किती आणि कसे कष्ट घेतले? कोणकोणत्या संकटांचा सामना केला? भारतात तेरा वर्षे राहून त्यानं कसा अभ्यास केला? आणि भारतातून सोबत नेलेल्या ग्रंथांचं चिनी भाषेत कसं भाषांतर केलं? हे सगळं जाणून घेता येतं. शिवाय ष्वांगनं आपल्या या चीन ते भारत आणि भारत ते चीन प्रवासाची हकिगत लिहून ठेवली आहे. त्यातून त्या वेळचा भारत कसा होता? इथे कोणकोणते राजे होते? ते चांगले होते की वाईट होते? त्या वेळचे लोक कसे होते? ते कसे राहत? अशा अनेक गोष्टी समजतात.
पुस्तक वाचून हजार वर्षापूर्वी आणि त्याही आधीचे लोक कसे होते हे समजावून घेता येतं. थोडक्यात ष्वांगच्या पुस्तकातून हजार वर्षापूर्वीचा भारतच समजून घेता येतो. म्हणून हे वाचायचं.
 
  • युआन ष्वांगची भारत यात्रा : बेलिंदर आणि हरिंदर धनोआ, मराठी अनुवाद निर्मला चंद्रकांत
  • नॅशनल बुक ट्रस्ट, विभागीय ऑफिस, प्रभादेवी, मुंबई
  • पाने : 62, किंमत : 11 रुपये

Thursday 16 February 2012

या पेन्सिलींशी करा दोस्ती!

हे एक छान पुस्तक आहे.
ही गोष्ट आहे एका चिमुरडीची.
घरातले सगळे लोक टीव्ही पाहत असतात. तिच्याशी कुणीच खेळत नाही की, बोलत नाही. ती ज्याम कंटाळून जाते. मग वैतागून खुर्चीवर चढून टीव्हीच बंद करून टाकते.
पण त्यामुळे आई तिच्यावर रागावते. बाबा डोळे मोठे करतो आणि दादा परत टीव्ही चालू करतो.
आई ऑफिसातून घरी आली की सरळ स्वयंपाकघरात जाते आणि कामाला लागते. चिमुरडी आईच्या मागे मागे जाते. तेव्हा ती तिला उचलून एका खुर्चीवर ठेवते आणि परत आपल्या कामाला लागते. चिमुरडी बराच वेळ खुर्चीवर बसून आईचं काम संपण्याची वाट पाहते, पण ते काही संपत नाही. मग ती रडायला लागते. आई तिला उचलून घेते, लाडानं तिचा एक पापा घेते आणि तिला परत खुर्चीत बसवते.
आई जेवण बनवत असते तेव्हा चिमुरडीला तिचा चेहरा दिसत नाही. त्यामुळे चिमुरडी खूप नाराज होते.
दादा पण शाळेतून आल्यावर चिमुरडीशी खेळत नाही. त्याचं होमवर्क करत बसतो. चिमुरडी खूप वेळ त्याच्याजवळ बसून त्याचं होमवर्क संपण्याची वाट पाहते. पण खूप वेळ ते संपतच नाही. मग चिमुरडी खुर्चीच्या मागे जाऊन त्याची पेन्सिल घेऊन पळते. तो तिच्या मागे पळतो.
बाबा पण ऑफिसातून येतो, तेव्हा तिच्याशी खेळत नाही. पेपर वाचत बसतो. चिमुरडी खूप वेळ त्याचं पेपर वाचन संपण्याची वाट पाहते. पण खूप वेळ ते संपत नाही. मग चिमुरडी बाबाच्या जवळ जाऊन तो वाचत असतो, त्याच्यावर आपले हात ठेवते. बाबा तिच्याकडे पाहतो. तिच्या पोटाला गुदगुदल्या करतो. चिमुरडी हसायला लागते. बाबाही हसतो आणि पुन्हा पेपर वाचायला लागतो.
चिमुरडीला प्रश्न पडतो कुणीच का माझ्याशी बोलत नाही? कुणीच का माझ्याशी खेळत नाही?
चिमुरडी जमिनीवर पडून विचार करू लागली. पण ती चिमुरडीच. तिला विचार कसा करतात हे कुठं माहीत? ती खूप वेळ तशीच पडून राहिली. काय करावं हे तिला काही सुचत नव्हतं. ती तशीच कितीतरी वेळ पडून होती. मग अचानक तिच्या पायावर काहीतरी पडलं. ती एक हिरवी पेन्सिल होती. ती चिमुरडीला म्हणाली, ‘तू माझ्याशी खेळतेस का?’ चिमुरडीला त्या पेन्सिलीच्या बोलण्याची मोठी गंमत वाटली. तेवढ्यात टेबलावरच्या निळ्या, पिवळ्या आणि लाल पेन्सिलींनीही खाली उडय़ा मारल्या. चिमुरडीभोवती त्यांनी गोल रिंगण केलं.
हिरवी पेन्सिल म्हणाली, ‘तुला वाटत असेल तर खेळ आमच्याशी.
चिमुरडीला मोठं आश्चर्य वाटलं. पेन्सिली तिला म्हणाल्या, ‘हो, आपण चित्र काढायचा खेळ खेळू या.चिमुरडीला चित्र कसं काढायचं तेही माहीत नव्हतं. पेन्सिली तिला म्हणाल्या, ‘खेळून तर पहा, मोठी मज्जा येते हा खेळ खेळताना.
मग चिमुरडी आणि पेन्सिली चित्र काढू लागल्या. चिमुरडीला वाटलं आधी जेवण बनवणाऱ्या आईचंच चित्र काढू या. त्यासरशी हिरवी पेन्सिल तिच्या बोटांमध्ये येऊन बसली. चिमुरडीनं झटपट आईचे कपडे रंगवले. पिवळ्या पेन्सिलीनंही काही कपडे रंगवले. एका पेन्सिलीने आईचे केस रंगवले. सगळ्या पेन्सिली कामाला लागल्या. शिवाय त्यांचा कामाचा उरकही मोठा होता. त्यामुळे फटाफट चित्र तयार झालं. चित्र पूर्ण झाल्यावर चिमुरडीनं ते आईला दाखवलं. ते चित्रं अगदी आईसारखंच दिसत होतं. तिनं ते स्वयंपाकघरातल्या कपाटावर लावलं.
मग चिमुरडीनं पेपर वाचणाऱ्या बाबाचं, गृहपाठ करणा-या दादाचंही चित्र काढलं. ती त्यांना दाखवली. ती त्यांनाही खूप आवडली. बाबाला तर चित्र खूपच आवडलं. त्यानं ते भिंतीवर लावलं. दादालाही त्याचं गृहपाठ करतानाचं रंगीत चित्र खूप आवडलं. त्यानंही ते चित्र भिंतीवर लावलं. त्यामुळे चिमुरडी खूश झाली. आणि तिच्या पेन्सिलीही खूप खूप खूश झाल्या. आता तिच्याशी खेळायला आणि गप्पा मारायला लाल, पिवळ्या, हिरव्या, निळ्या अशा खूप पेन्सिली होत्या. त्या तिच्या मैत्रिणी झाल्या होत्या.
दोस्तांनो, तुम्हालाही कधी कधी खेळायला कुणी सोबती मिळत नसेल तर तर तुम्ही या चिमुरडीशी गप्पा मारू शकता. किंवा मग पेन्सिलीशी खेळू शकता. या रंगीत रंगीत पेन्सिली फार करामती आहेत. सारी कामं त्या फटाफट करतात आणि सुंदर सुंदर चित्रं काढतात. त्यामुळे मज्जा येते. तर मग येणार ना तुम्ही पेन्सिलीशी खेळायला?
जरूर या बरं!
मूळ इंग्रजी भाषेतल्या या पुस्तकाचा हिंदी अनुवाद मनीषा चौधरी यांनी केला आहे. संपूर्ण रंगीत असलेल्या या पुस्तकात खूप चांगली चित्रं आहेत.
मैं और मेरी रंगीन पेंसिल : मासुमेह अंसारियन
प्रथम बुक्स, नवी दिल्ली
पाने : २४, किंमत : २५ रुपये

Saturday 11 February 2012

चांदोबाचं हाय हाय, चिमणीचं बाय बाय


दोन होते बोकेआणि अरे अरे मोराही दोन्ही कवितांची पुस्तकं आहेत. यातल्या कविता तशा गमतीच्या आहेत,
दोन होते बोके
कपड्यांच्या दोरीला
घेत होते झोके
किंवा मोराही कविता पहा-
अरे अरे मोरा
काय तुझा तोरा
पहा जरा आकाशात
ढग आहे कोरा!

मोर पावसाची चाहूल लागली की नाचतो. पिसारा फुलवून मनसोक्त नाचतो. पण एरवी तो डौलात चालतो. त्याचा डौल पाहून एका मुलाला हा प्रश्न पडतो. तो मुलगा पुढे म्हणतो-

फुलवतो पिसारा छान
नाचतो ही छान
गाणे कसे ऐकतो
दिसत नाही कान!

एकदा एका माकडानं ऐटीत चालणारा माणूस पाहिला. त्याला वाटलं आपण अशीच ऐट करावी. पण ती करणार कशी? मग त्यानं एक शक्कल लढवली-

माकडाने पाहिली माणसाची ऐट
मग त्याने घेतली शिंप्याची भेट
सुटा-बुटाचं कापड आणलं
टुणटुण उडत माप दिलं
शिंप्याने शिवला होता सूट
माकडाला झाला होता फिट

मग काय, माकड तो सूट घालून सुटाबुटात फिरलं, पण जंगलात.
या पुस्तकातली मुंगी मोठी विसरभोळी आहे. तिच्या काही म्हणून लक्षातच राहात नाही.

घरातून जाताना
आई खूप सांगते
पण चालताना मुंगी
सगळं विसरून जाते
रस्त्यावर पडलेलं
खात पुढे जाते
इवल्या इवल्या पायांनी
तुरू तुरू चालते
काय काय बोलते
घरी जायचं तेवढं
ती विसरून जाते.

असंच गमतीचं एक फूल आहे. ते मुलींसारखी फॅशन करतं-

एक होतं फूल
त्याच्या कानात डूल
त्याला पडली भूल
भुंगा म्हणाला, बी कूल
कोंबडा, अस्वल, मनीमाऊ, चिमणी, परी, झुरळ, घार, गोगलगाय यांच्या कविताही अशाच गमतीच्या आहेत.
अरे अरे मोरायातही अशाच तीस कविता आहेत.

एक जोकर एका झाडीच्या फांदीवर जाऊन बसतो आणि गडबड होते-
एकदा झाडावर बसला एक जोकर
फांदीने त्याला मारली ठोकर
तसा त्याने दिला मोठा ढेकर
ढेकर ऐकून हसला नोकर
झाडावर होती माकडे पाच
जोकरने केला फांदीवर नाच
हलवली त्याने फांदी नुस्ती
पडली सारी माकडे खाल्ती

यातल्या सगळ्या कविता प्राण्या-पक्ष्यांच्याच नाहीत काही! काही कविता तुमच्या घराबद्दलही आहेत. ही पहा-

नळाला येतं
सकाळी पाणी
रेडिओवर लागतात
मराठी गाणी
आजोबा गातात
अभंगवाणी
आई दिसते
घराची राणी!
सकाळी असते
सर्वाना घाई
ऑफिसला जाते
बेबीताई

एके दिवशी चंद्राला हुक्की आली. रोज रोज आकाशात उंचावर राहून राहून त्याला फार कंटाळा आला. मग-

एक दिवस एक दिवस
असे काय झाले
ढगामधून चांदोमामा
हळूच खाली आले
आल्या आल्या चांदोमामा
बादलीमध्ये पडले
एवढय़ाशी पाण्यातसुद्धा
भिजून चिंब झाले
तळे समजून बादलीला
त्यात लागले बुडू
तळाला जाता जाता
त्याला आले रडू
शेवटी घरातल्या लोकांनी चांदोबाला बाहेर काढलं. चांदोबानं मग थेट घर गाठलं. मागेसुद्धा वळून पाहिलं नाही. त्याची चांगली खोड मोडली. पण चांदोबा घरी जातात न जातात तो एका विमानात चिमणी घुसली.
एकदा एक चिमणी
विमानात घुसली
विमानात गेल्यावर
तिथेच फसली
एअर होस्टेस तिला बघून
गोड गोड हसली
चिमणी विमानात बसून मस्त फिरून आली. विमान खाली येऊ लागले तेव्हा-
विमानाने जेव्हा मात्र
पुन्हा लँडिंग केले
चिमणीने हळूच तेव्हा
सा-यांना बाय बाय केले

पण तुम्ही या दोन्ही पुस्तकांना हाय हायकरा. म्हणजे तुम्हाला चिमणीसारखा मस्त प्रवास करता येईल. मनसोक्त प्रवास करून झाला की, सर्वाना असंच गोड बाय बायकरा. पण त्यासाठी पहिल्यांदा हायकरायला विसरू नका.

अरे अरे मोरा आणि दोन होते बोके : मोहन काळे
अक्षर चळवळ प्रकाशन, मुंबई
पाने : प्रत्येकी 40
किंमत : प्रत्येकी 45 रुपये

Thursday 2 February 2012

पाचबल रोलची दे धम्माल!

आज तुम्हाला एका चिनी पुस्तकाची ओळख करून देणार आहोत. मूळ चिनी पुस्तकाचं नाव आहे, फाइव्ह चायनीज ब्रदर्स. त्याचा हा मराठी अनुवाद आहे.
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
आज तुम्हाला एका चिनी पुस्तकाची ओळख करून देणार आहोत. मूळ चिनी पुस्तकाचं नाव आहे, फाइव्ह चायनीज ब्रदर्स. त्याचा हा मराठी अनुवाद आहे.
तर ही पाच चिनी भावांची गोष्ट आहे. हे पाचही भाऊ दिसायला सारखे होते. म्हणजे एकमेकांची डुप्लिकेट होते. सिनेमांत तुम्ही अनेकदा हिरोचा डबल रोल पाहता, पण या पुस्तकात तो पाचबल रोलआहे.
 
पाचही भाऊ दिसायला तसे ध्यान होते! म्हणजे सगळ्याच्या डोक्यावर काळी टोपी आणि लांबलचक बारीक वाढवलेली शेंडी. शिवाय ते कपडेही सारखेच घालायचे. त्यामुळे त्यांना पाहणा-यांना कळायचंच नाही की, त्यातलं कोण कुणासारखं आहे! पण हे भाऊ दिसायला थोडेसे बावळट ध्यान असले तरी मोठे हुशार होते.   म्हणजे त्या पाचही भावांकडे एकेक मजा होती. पहिला भाऊ समुद्राचं सगळं पाणी पिऊ शकायचा. दुस-या भावाची मान लोखंडाची होती. तिस-या भावाचे पाय खूप लांब लांब व्हायचे. म्हणजे तो त्याला हवे तेव्हा त्याचे पाय हवे तेवढे लांब करायचा आणि हवे तेव्हा कमीही करता यायचे. चौथा भाऊ आगीतून येऊ-जाऊ शकायचा. म्हणजे त्याला आग काहीही करू शकायची नाही. आणि पाचवा भाऊ त्याचा श्वास कितीही वेळ थांबून ठेवू शकायचा. आहे की नाही गंमत? म्हणूनच म्हटलं होतं की, हे पाचही भाऊ जरासे चमत्कारिकच होते. पण गुणी होते बिच्चारे!
 
हे पाचही भाऊ आपल्या आईसोबत समुद्राकाठच्या एका छोटय़ा घरात राहत होते.
 
पहिला भाऊ रोज सकाळी समुद्रावर मासे पकडायला जात असे. तो रोज खूप रंगीबेरंगी मासे पकडत असे. ते मासे गावातल्या बाजारात विकत असे. त्या माशांना खूप चांगली किंमत येई. एके दिवशी एक छोटा मुलगा त्याला म्हणाला, ‘मला तुमच्याबरोबर मासे पकडायला न्याल का?’ पहिला भाऊ म्हणाला, ‘नाही नेणार.पण त्या छोटय़ा मुलानं खूपच हट्ट धरला. मग पहिला भाऊ म्हणाला, ‘तिथं तुला माझं ऐकावं लागणार.तो मुलगा होम्हणाला. दुस-या दिवशी समुद्रावर गेल्यावर पहिला भाऊ त्या मुलाला म्हणाला, ‘तुझ्या लक्षात आहे ना मी सांगितलेलं?’ मुलानं मान डोलावली. मग पहिल्या भावानं समुद्राचं सगळं पाणी पिऊन टाकलं. सगळं पाणी संपल्यामुळे मासे  तडफडू लागले. हे पाहून तो छोटा मुलगा फार खुश झाला. तो नाचायला लागला. समुद्रातले शंख-शिंपले गोळा करू लागला. थोडय़ा वेळानं पहिल्या भावानं काही मासे पकडले. त्यानं समुद्राचं सगळं पाणी पिऊन टाकलं नव्हतं, नुसतं तोंडात घेतलं होतं. म्हणजे तुम्ही चूळ भरता ना तसं. आता बराच वेळ झाल्यामुळे त्याचं तोंड गळून आलं होतं. अख्या समुद्राचं पाणी तोंडात धरून ठेवणं चेष्टा आहे का राव? म्हणून त्यानं समुद्रातले शंख-शिंपले गोळा करणाऱ्या त्या छोटय़ा मुलाला बाहेर यायला सांगितलं, पण तो काही आला नाही. मग त्यानं खूप हातवारे करून त्याला बोलवायचा प्रयत्न केला. पण तो मुलगा काही त्याचं ऐकेना. पहिल्या भावाच्या तोंडात अख्या समुद्र सारखा बाहेर यायला उसळी मारत होता. शेवटी त्याला राहवलं नाही. त्यानं ते पाणी परत समुद्रात टाकायला सुरुवात केली. सगळं पाणी टाकल्यावर समुद्र परत काठोकाठ भरून गेला. त्यात तो छोटा मुलगा वाहून गेला. आता झाली का पंचाईत?
 
पहिला भाऊ एकटाच गावात परत आला. छोटा मुलगा वाहून गेल्याची शिक्षा म्हणून त्याचं डोकं छाटून टाकण्याची शिक्षा झाली. तेव्हा तो म्हणाला, ‘मला माझ्या आईला शेवटचं भेटू द्या.लोकांनी परवानगी दिली. तो घरी आला आणि त्यानं त्याच्या दुस-या भावाला पाठवलं. ते पाचही भाऊ दिसायला सारखे असल्यामुळे कुणाला काही कळलं नाही. या दुस-या भावाची मान लोखंडाची होती. त्यामुळे ती तलवारीनं कापली गेली नाही. मग त्याला समुद्रात बुडवायचं ठरलं. तेव्हा दुसरा भाऊ म्हणाला, ‘मला आईला शेवटचं भेटू द्या.घरी आल्यावर त्यानं तिस-या भावाला पाठवलं. ते पाचही भाऊ दिसायला सारखे असल्यामुळे कुणाला काही कळलं नाही. या तिस-या भावाचे पाय खूप लांब व्हायचे. त्यामुळे त्याला समुद्रात टाकलं, तेव्हा त्याने आपले पाय लांब करायला सुरुवात केली. ते त्याने इतके लांब केले की, त्याचं डोकं समुद्राच्या पाण्याबाहेर आलं, पाय समुद्राच्या तळाला टेकले.
 
मग लोकांनी त्याला जाळून टाकायचं ठरवलं. तेव्हा तिसरा भाऊ म्हणाला, ‘मला आईला शेवटचं भेटू द्या.घरी आल्यावर त्यानं चौथ्या भावाला पाठवलं. या भावाला आग काहीच करू शकत नसे. म्हणून तोही आग लावल्यावर जिवंत राहिला. आता लोक खूपच चिडले. त्यांनी त्याला आगीच्या भट्टीतच टाकायचं ठरवलं. सारे लोक आगीच्या भट्टीबाहेर उभे राहिले रात्रभर. सकाळी तो चौथा भाऊ डोळे चोळत बाहेर आला आणि त्या लोकांना म्हणाला, ‘रात्री काय छान झोप लागली मला!तेवढ्यात तिथे न्यायाधीश आले. ते त्याला जिवंत पाहून म्हणाले,‘तुला मारण्याचा आम्ही आटोकाट प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळी अपयश आलं. त्यामुळे तू निर्दोष आहेस हे सिद्ध होतं.
 
मग त्याला सोडून दिलं. तो चौथा भाऊ घरी आला. त्या दिवसापासून पाचही भाऊ आपल्या आईसोबत मजेत राहू लागले.
 पाच चिनी भाऊ : क्लेअर हचिट बिशपमराठी अनुवाद : नेहा सुगवेकरकजा कजा मरू प्रकाशन,द्वारा गरवारे बालभवन, पुणे
फोन : 020-24442109
पाने : 36, किंमत : 15 रुपये