Sunday 27 November 2011

गोष्टी चांगुलपणाच्या !

मागच्या शुक्रवारी साने गुरुजींच्या गोड गोष्टीया दहा पुस्तकांच्या मालेतील पहिल्या पाच पुस्तकांचा परिचय करून दिला होता. आता उरलेल्या पाच पुस्तकांचा परिचय करून देत आहोत. नावाप्रमाणेच या गोड गोष्टी आहेत. यात देश-विदेशातील कथा-लोककथा आणि कादंब-यातील गोष्टी आहेत. पण त्या साने गुरुजींनी स्वत:च्या भाषेत लिहून काढल्या आहेत. त्यांनी खास तुम्हाला आवडेल असे मराठी रूपांतरही केले. परंतु यातल्या काही गोष्टी खूप वर्षापूर्वीच्या असल्याने त्या तुम्हाला थोडय़ाशा बाळबोध वाटण्याची शक्यता आहे. मात्र तरीही प्रत्येक गोष्ट तुम्ही नेटाने शेवटपर्यंत वाचली तरी ती तुम्हाला नक्कीच आवडेल.
 
सोराब नि रुस्तुमया सहाव्या पुस्तकात एकंदर चार गोष्टी आहेत. पहिली गोष्ट वामन भटजींची गायही सत्यकथा आहे, असे साने गुरुजींनी म्हटले आहे. गाई-गुरंही माणसांसारखीच असतात, फक्त त्यांना बोलता येत नाही एवढेच. आपल्यासारख्याच त्यांनाही भावभावना असतात, तीही प्रेम करतात. याचे उदाहरण म्हणजे या गोष्टीतली वामन भटजींची सावळीही गाय आणि प्रेमळ वामन भटजी ही जोडी आहे. पाखराची गोष्टही या पुस्तकातली सर्वात सुंदर गोष्ट आहे. ही मूळ गोष्ट आहे खंडय़ा या शेतकऱ्याची आणि त्याच्या एका मित्राची. हा मित्र एक पक्षी असतो. तो खंडूच्या घरी राहून माणसासाररखं बोलायला शिकतो. खंडू त्याला एक दिवस रानात सोडून देतो. पण त्याची फार आठवण आली की, त्याला भेटायला जातो. तो पक्षी, त्याची बायको आणि मुलं खंडूचं स्वागत करतात, त्याला गोड गोड फळं खायला देतात. सोराब आणि रुस्तुमहा या पुस्तकातली शेवटची गोष्ट रुस्तुम या शूरवीर योद्धयाची आणि त्याच्या तेवढय़ाच शूर सोराब या मुलाची. सोराब आणि रुस्तुम दोघेही एकमेकांशी लढाई करतात, त्याचे रोमांचक वर्णन या गोष्टीत आहे.
 बेबी सरोजाही मूळ तमिळ भाषेतली कादंबरी आहे. साने गुरुजींच्या सोबत एक तमिळ माणूस तुरुंगात होता. त्याने गुरुजींना अनेक गोष्टी सांगितल्या. बेबी सरोजाही तमिळ भाषेतली प्रसिद्ध कादंबरी आहे. तिच्यावर चित्रपटही निघालेला आहे. प्रेमा या धाडसी आणि कर्तृत्वावान मुलीची ही गोष्ट आहे. प्रेमाचे गोरगरिबांवर प्रेम असते. ती लोकांची सेवा करते. त्याचेच हे पुस्तक आहे.
करुणादेवीही गोष्ट एका जपानी नाटकातली आहे. मूळ गोष्ट संक्षिप्तपणे दोन-तीन पानांत होती. साने गुरुजींनी त्या आधारे ५२ पानांची ही गोष्ट लिहिली. शिरीष या गुणवान प्रधानाची आणि हेमा आणि करुणा या त्याच्या दोन पत्नींची ही कहाणी आहे. नावाप्रमाणेच करुणा असलेली शिरीषची ही पहिली पत्नी आपल्या प्रेमाच्या आणि करुणेच्या जोरावर आपल्या पतीला परत मिळवते, तर समान्य शेतकऱ्याच्या मुलगा असलेला शिरीष आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर राजाचा मुख्य प्रधान होतो. हेमा ही गुणी आणि सालस मुलगी त्याची दुसरी पत्नी होते. हेमा आणि करुणा सख्ख्या बहिणींप्रमाणे राहतात. ही गोष्ट जुन्या वळणाची असली तरी ती वाचनीय नक्कीच आहे.
 यती की पतीचार्ल्स रीड यांच्या क्लोस्टर अँड हेअर्थया कादंबरीवरून ही गोष्ट साने गुरुजींनी लिहिली आहे. पंधराव्या शतकातली ही ऐतिहासिक कादंबरी मानली जाते. या कादंबरीला साने गुरुजींना खास महाराष्ट्रीय टच दिला आहे. यातल्या नायकाचे नाव आहे विजय आणि त्याच्या पत्नीचे नाव आहे मुक्ता. नावाप्रमाणेच ही विजयाची, सद्गुणांची आणि परोपकाराची जोडी आहे. आपल्या वागण्या-बोलण्याने आणि गुणांनी शत्रूला जिंकून घेण्याचे त्यांचे कसब खरोखरच प्रेरणा देणारे आहे.
चित्रा नि चारूहे या दहा पुस्तकांच्या मालेतील शेवटचे पुस्तक. यात तमिळ भाषेतील कथा आहेत. खूप छान स्वभावाच्या माणसांची जगातल्या काही दुष्ट प्रवृत्तीच्या माणसांमुळे कशी फरफट होते आणि चांगल्या स्वभावाच्या माणसांमुळे चांगल्या गोष्टी कशा घडून येतात याचीच ही गोष्ट आहे. चित्रा आणि चारू या पतीपत्नींच्या या गोष्टीमध्ये परधर्मसहिष्णूतेचा धडाही दिला आहे. ही गोष्टही गुरुजींनी त्यांच्या एका तमिळ मित्राकडून धुळ्याच्या तुरुंगात ऐकली होती. नंतर त्यांच्या भाषेत लिहून काढली.
 या गोष्टींतून साने गुरुजींनी चांगल्या वागणुकीची शिकवण. स्वार्थी आणि अप्पलपोटय़ा जगामध्ये चांगुलपणाने, मानाने, गोड स्वभावाने कसे जगावे याबद्दल फार छान त-हेने सांगितले आहे. म्हणूनच या गोड गोड गोष्टी वाचायला हव्यात.

No comments:

Post a Comment